टीव्ही वरती वेगवेगळ्या चैनलवर मराठी-हिंदी तसेच वेगवेगळ्या भाषेत सिरीयल, नवनवे कन्टेन्ट घेऊन प्रदर्शित होत राहात असतात. नव्या मालिकेतून नवे चेहरे तर काही वेळा जुन्याचं आवडत्या हीरो हीरोइन यांना बघणे प्रेक्षकांना फारच मनोरंजक वाटते टीव्ही सिरीयल मध्ये घडणारे कथानक प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागते आणि प्रेक्षक पूर्णपणे त्या कथानकाला भोवती कधी गुंफले जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही! टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या अभिनेता अभिनेत्री सोबत त्यांच्या सुख दुःखामधल्या प्रसंगात प्रेक्षकही समरसून सहभागी होत असतात.
काही काही टीव्ही सिरीयल प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचतात, यामागे त्या सिरीयल मधील सर्व कलाकार, त्यांची टीम या सर्वांचा हातभार असतो. या टीव्ही सिरीयल मध्ये काम करणारे मुख्य कलाकार प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले दिसतात! एवढेच काय घराघरात देखील या मालिकेमध्ये आता काय होणार? हा किंवा ही आता काय निर्णय घेईल? अशा चर्चा सर्रास घडताना दिसतात. आजकाल तर सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन लोकं एखाद्या भागा विषयी आपले मत किंवा नाराजगी किंवा आजचा भाग कसा छान खुलला याबद्दल आवर्जुन प्रतिक्रिया नोंदवताना दिसतात.
असे सर्व आलबेल असूनही काही वेळेस मालिकेतील मुख्य कलाकारांना काही कटू निर्णय घ्यावे लागतात आणि यासोबतच आपल्या आवडत्या मालिकेमधून एक्झिट सुद्धा घ्यावी लागते. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही लोकप्रिय कलाकार आणि त्यांनी एक्झिट घेतलेल्या मालिका याबद्दलची माहिती सांगणार आहोत.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना तडकाफडकी काढण्यात आले आणि त्यानंतर सोशल मीडियावर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या, आता किरण माने यांनी उठवलेल्या आवाजामुळे या निर्णया मागची दाहकता जनतेपर्यंत पोहोचली आहे. परंतु अशी प्रकरणे फक्त एकच नव्हे तर अनेक कलाकारांसोबत घडलेली आहेत. ज्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक मालिकेमधून रिप्लेस करण्यात आले आहे. या सर्व कलाकारांची कारणे मात्र निरनिराळी असल्याचे समजते.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधून शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने सुद्धा अचानक मालिकेतून एक्झिट घेतली त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मालिकेतील सहकलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने तसेच अपूर्वाला कामाचे चेक मिळत नसल्यामुळे, आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्या बद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेयर करून तिने सर्वांना याबाबत माहिती दिली होती.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतील मुख्य नायिका, म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याचे समजते. निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका सोडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच बरोबर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीरं झालं जी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं. या मालिकेतील खलनायिका म्हणजेच मामीची भूमीका साकारणारी अभिनेत्री विद्या सावळे यांनासुद्धा मालिकेतून अचानक निरोप घ्यावा लागला होता. खाजगी कारण सांगत त्यांनी ही मालिका सोडल्याचे समजते.
त्यानंतर मानधनाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ही मालिका त्यांनी सोडल्याचे कारण समोर आलं होतं, परंतु वरिष्ठांनी मानधन वाढवणे शक्य नसल्याचे सांगितल्याने त्यांनी पुढे मालिका न करण्याचा निर्णय घेतला. अनेक मालिकांमधून लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना सुद्धा अशा पद्धतीने किंवा अशाच काही कारणास्तव अचानक एका रात्रीत रिप्लेस करण्यात येतं किंवा ते पात्र संपुष्टात आणण्यात येतात. अशा घटना मालिकांच्या विश्वामध्ये कायम सुरूच असतात. तर तुम्हाला यामधील कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री संबंधित पात्राच्या भूमिकेत पहायला आवडत होते हे रिप्लाय देऊन नक्की कळवा!